Sunday, May 29, 2011

एक दुर्लक्षित मित्र

एक दुर्लक्षित मित्र

आपल्या आसपास काही प्राणी दुर्लक्षित असतात. काही प्राण्यांना आपण गृहीत धरतो. असाच एक प्राणी आहे डुक्कर. आदिवासी समाजात डुक्कर हा प्राणी फार महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक सणावाराला आणि महत्त्वाची मेजवानी देण्यासाठी डुकराच्या मांसाचे फार महत्त्व आहे. डुक्कर हा आकाराने फार मोठा प्राणी असल्याने एकटय़ा कुटुंबासाठी त्याचे मांस जास्त होते. त्यामुळे समूहातच मांसाचे वाटे केले जातात.
प्रत्येक आदिवासींच्या घरासमोर खास डुकरांसाठी लाकूड आणि कवेलूंचा उपयोग करून तयार केलेलं एक घर असतं. त्याला ‘पदगुडा’ म्हणतात. (गोंडी भाषेमध्ये पदी म्हणजे गावठी डुक्कर आणि गेडापदी म्हणजे रानटी डुक्कर) लोक सांगतात की, डुकराचे घर हे आतून फारच स्वच्छ असतं. डुक्कर हा आपल्या घरात कधीच घाण करत नाही. मेंढय़ात ८-१० पिलांच्या कळपासह आरामात चाललेली डुकरीण बघितली की, जगाची चिंता न करता आपल्याच मस्तीत चाललेल्या परम योग्याची आठवण येते. आपल्या पिल्लांना दूध पाजताना डुकरीणीच्या चेहऱ्यावरचा परम तृप्तीचा भाव प्रत्येक क्षणाला जीवनाचा आनंद लुटणाऱ्या तपस्वीची आठवण करून देतो.
डुक्कर हा प्राणी खरं म्हणजे गाढवाच्या स्वभावासारखा आहे असं वाटतं. शांत, समजूतदार. आपण या जगात कशासाठी आलो आहोत याची पुरेपूर जाणीव असलेला आणि सदासर्वदा आपल्या ध्येय प्राप्तीच्या प्रयत्नात असलेला हा प्राणी! हा प्राणी कोणालाही त्रास देत नाही, आरडाओरड करत नाहीत, चावत नाही, त्याची काळजी घेणे फार सोपे, पण रानडुकरांच्या बाबतीत असं नाही. त्याचा स्वभाव उग्र, तो मस्तीखोर, त्याची शिकार करणे अवघड, तो शेतीचे नुकसान करतो, माणसांवर हल्ला करून त्याला गंभीर दुखापत करू शकतो. रानडुकराचं २०० किलोचं धुड जेव्हा माणसावर आदळतं तेव्हा त्याचं काय होत असेल? कल्पना करा. प्रा. सुकुमाराचं हत्तींवरचं पुस्तक वाचत होतो. हत्ती शेतीची नासधूस कशी करतो, माणसांवर हल्ला कसा करतो याचं फार चांगलं वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केलं आहे. मला हत्तीत आणि रानडुकरात बरंच साम्य आढळतं. त्यांची शेतीची नासधूस करण्याची पद्धत सारखीच वाटते. म्हणजे खाणं कमी नाश जास्त!
आदिवासींकडे असलेल्या संपत्तीबद्दल आश्चर्य वाटत आलं आहे. त्यांच्या संपत्तीत शेती, पाळीव प्राणी यांचा फार मोठा सहभाग असतो. त्या संपत्तीतला डुक्कर हा महत्त्वाचा घटक. ती आदिवासींची एक प्रकारची जिवंत संपत्ती आहे. ते प्रत्येकाकडे असायलाच हवे,नाहीतर तुम्ही गरीब समजले जाण्याची शक्यता असते. मेंढय़ात प्रत्येक घरात सरासरीने ५ ते ६ डुकरं आणि २ ते ३ कुत्रे तरी असतात. सकाळीच पदगुडय़ातून मुक्त केलेली डुकरं दिवसभर गावाच्या आसपास चरत असतात. संध्याकाळी त्यांना पदगुडय़ात पुन्हा बंद केले जाते.
प्राण्यांचा अभ्यास करताना वाटतं, आपण काही प्राण्यांवर अन्यायच केलेला आहे. यातील तीन प्राणी म्हणजे पाळीव डुक्कर, गाढव आणि पाळीव कुत्रा. हे तीनही प्राणी ग्रामीण भारताचे फार महत्त्वाचे भाग असूनही, या प्राण्यांचा परिस्थितीकीय अंगाने, स्वभावावर फारसे अभ्यास झालेले दिसत नाहीत.
डुकरांबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊ या. सस्तन प्राण्यांच्या सुईडी (Suidae) या परिवारातली डुक्कर ही जात. ज्याला शास्त्रीय भाषेत सस स्क्रोफा (Sus scrofa) म्हणतात. पाळीव डुक्करं ही त्याची उपजात (Sus scrfa domestica). भारतात आढळणाऱ्या जंगली डुकरांना सस स्क्रोफा क्रिस्टाटस (Sus scrfa cristatus) म्हटलं जातं. भारतात वाघाचं डुक्कर हे महत्त्वाचं खाद्य आहे.
७ ते ९ हजार वर्षांआधी मानवाने डुकराला पाळायला सुरुवात केली असावी. जगभरात वेगवेगळ्या ७ प्रदेशांमध्ये एकाच वेळी जंगली डुकराला मानसाळण्याची सुरवात झाली असावी, असे अभ्यासक सांगतात. मांसासोबतच त्यांची मजबूत हाडे शेकडो वर्षांपर्यंत आयुधं आणि ढाली बनवण्यासाठी वापरात होती आणि त्याच्या केसांचा उपयोग तेव्हाही आणि आताही ब्रश तयार करण्याकरिता केला जातो. एखाद्या व्यक्तीला निर्बुद्ध, अस्वच्छ, आळशी म्हणून हिणवण्यासाठी आपण डुक्कर या शब्दाचा उपयोग करतो. प्रत्यक्षात मात्र, डुक्कर हा फार बुद्धिमान प्राणी आहे. कुत्रे आणि मांजरापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षित केले जाऊ शकते असे अभ्यासक मानतात. जगभर हा प्राणी आढळतो.
जगभरातल्या आदिवासी व अन्य संस्कृतीत डुकरांचं स्थान महत्त्वाचं आहे. चीनमध्ये डुक्कर हे त्यांच्या बाराव्या राशीचं प्रतीक आहे. चिनी संस्कृतीत डुक्कर हे ओज, चेतना आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानण्यात येते. मलायन आर्चीपेलागोचा भाग असलेल्या बॅर्नियो (borneo) देशात जंगली डुकरांच्या कवटय़ा बहादुरीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात आणि माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत दफन केल्या जातात. निकोबार बेटांवर सुद्धा डुकरांचे सांस्कृतिक दृष्टय़ा फार महत्त्व आहे. त्यांचे डुकरांबद्दलचे प्रेम वाखाणन्यासारखे असते, अगदी डुकराच्या प्रेमात त्यांनी गाणी आणि कवितासुद्धा लिहल्या आहेत. हिंदू धर्मात विष्णूचा तिसरा अवतार वराहाच्या स्वरूपातच होता. हिरण्ययक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला सागराच्या तळाशी लपवून ठेवले तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी विष्णूने वराहाचे रूप घेतले आणि सागराच्या तळातून धरतीची सुटका केली. याच काळापासून नव्या कल्पाची सुरुवात झाली.
डुकरांच्या मी नोंदवलेल्या एका विशिष्ट स्वभाव वैशिष्टय़ावर प्रकाश टाकू . गडचिरोलीच्या बसस्टँडवर उभा होतो. आपल्या ८-१० पिलांसह एक भली मोठी डुकरीण आरामात समोरून चालली होती. अचानक समोरून येणाऱ्या बसने एका मध्यम आकाराच्या डुकराला चिरडले. तो जागीच ठार झाला. अगदी दोन मिनिटांसाठी सर्व डुक्कर स्तब्ध झाले, पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी मेलेल्या पिलाला खायला सुरुवात केली. पाच मिनिटांच्या कालावधीत हाडे आणि कवटीसह अख्ख पिल्लू डुकरांनी फस्त केलं आणि जणू काही काही घडलंच नाही या तोऱ्यात मजलदरमजल करीत तो काफीला निघून गेला.
बंगळुरला पोहचल्यावर प्रा. माधव गाडगीळांना हे निरीक्षण सांगितलं. त्यांनी सांगितलं की, ‘कॅनाबॅलीझमचा’ (स्वत:च्याच प्रजातीला खाऊन टाकण्याची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती सस्तन प्राण्यामध्ये फारशी आढळत नाही.) हा एक प्रकार आहे. जेव्हा डुकरांना वाटलं की, आता आपल्या हातात काहीच नाही, तेव्हा संसाधन वाया न जाऊ देण्यासाठी त्यांनी स्वत:च फस्त करून टाकलं. यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलं. हावर्ड विद्यापीठातून परतल्यानंतर ते पेपर व्ॉप्स (paper wasp) नावाच्या भिंगोटीच्या स्वभावाचा अभ्यास करत होते. भिंगोटीच्या एका वसाहतीत बऱ्याच भिंगोटय़ा आणि त्यांची अंडी होती. काही दिवसानंतर अंडय़ावर एक रोग आला आणि हळूहळू अंडी नष्ट व्हायला लागली. आता आपली अंडी वाचण्याची शाश्वती नाही हे जाणून भिंगोटय़ांनी स्वत:च ती फस्त करायला सुरुवात केली!
हे ऐकून फारच अंतर्मुख झालो. मानवी जीवन मूल्य आणि नैसर्गिक मूल्य यात बरीच तफावत आहे. निसर्ग फायदे आणि तोटे या तत्वावर चालतो. तिथे सीमित संसाधनातून जीवनाचा प्रवास कसा अखंडितपणे सुरू राहिल हे बघावं लागतं. संसाधन वाया घालवून चालत नाही. ते (उदा. प्रथिनं) तयार करण्यासाठी निसर्गाला बरीच मेहनत घ्यावी लागते, ते असेच वाया गेलेले चालत नाही. कोणत्याही परिस्थितीत संसाधनाचे रूपांतर ऊर्जेत व्हायला पाहिजे, ही निसर्गाची ठाम भूमिका असते.

(लोकसत्ता. विदर्भरंग. २९ मे २०११)

जैवविविधता -निसर्गाचे मूळ तत्व

जैवविविधता -निसर्गाचे मूळ तत्व

ब्राझीलमधील रिओ-डी-जानेरो शहरात ३ जून ते १४ जून १९९२ दरम्यान वसुंधरा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत जैवविविधतेचे संवर्धन, शाश्वत व टिकाऊ उपयोग आणि फायद्याच्या न्याय्य वाटपाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय करार पारित करण्यात आला. या करारातील नमूद बाबी २२ मे १९९२ पासून सर्व परिषदेत सामील झालेल्या राष्ट्रांनी मान्य केल्या. तेव्हापासूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
१५ ते २० अब्ज वर्षांपूर्वी ऊर्जेने परिपूर्ण अशा अणूंपेक्षाही छोटय़ा आकाराच्या कणांमध्ये (Sub atomic particles) महाविस्फोट (Big Bang) होऊन ब्रह्मांडाचा जन्म झाला. विस्फोटानंतर क्षणार्धातच हायड्रोजन आणि हिलियमसारख्या अत्यंत साध्या अणूंची उत्पत्ती झाली. त्या आधी पदार्थ म्हणा किंवा ऊर्जा अगदी ठासून एका ठिकाणी बंदिस्त होती. स्फोटामुळे ऊर्जा बाहेर पडली, तिचा पसरायला लागली आणि आजच्या सतत विस्तार पावणाऱ्या ब्रह्मांडाचा जन्म झाला. जसजसे अणू थंड व्हायला लागले तसे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचे संघनन व्हायला लागले आणि ताऱ्यांचा जन्म झाला. सोलर नेब्युला (ज्यापासून पुढे सौर कुलाचा जन्म झाला) हा अशाच असंख्य तारकासमूहांपैकी एक तप्त, ऊर्जेने ठासून भरलेला गोळा होता. ४.६ अब्ज वर्षांआधी सोलर नेब्युलाच्या शेजारी असलेल्या तारकासमूहाने निर्माण केलेल्या अती ऊर्जा तरंगामुळे (Shock Wave) नेब्युलाला स्वत:च्या आसाभोवती फिरण्याची गती मिळाली. नेब्युलाच्या मध्यभागी (हाच आपला सुर्य) असलेल्या हायड्रोजन आणि हिलियमला वर्तुळाकार फिरण्याने गतीज ऊर्जा (Kinetic energy) प्राप्त झाली. हायड्रोजनचे हिलियममध्ये आणि हिलियमचे हायड्रोजनमध्ये रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेत ऊर्जा उत्पन्न व्हायला लागली. सूर्य प्रकाशमान झाला. सूर्याच्या आसपास पसरलेल्या छोटय़ा छोटय़ा (!) तुकडय़ांमध्ये एक तुकडा होता पृथ्वी नावाचा.
कालांतराने पृथ्वी आणि इतर अणू थंड व्हायला लागले. पृथ्वीवर मात्र काही वेगळ्या घटना घडल्या. हायड्रोजनचे दोन अणू प्राणवायूचा एक अणू अशी भागीदारी होऊन पाण्याची उत्पत्ती झाली. हे पाणी पृथ्वीवरच्या विशाल डबक्यांमध्ये साठून सागरांची, महासागरांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे निर्माण झालेल्या महासागरातल्या उष्ण पाण्यात अनेक कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस इत्यादीसारखी साधी मूलद्रव्ये होती. उष्ण पाण्याच्या या अनेक मूलद्रव्यांनी बनलेल्या ‘मसालेदार’ द्रावणाला ‘प्रायमॉरडियल हॉट सुप’ (अती प्राचीन उष्ण कढी!) म्हणतात. अशा कढीमधल्या विविध रेणूंमध्ये लाखो वर्षांपर्यंत संबंध येते राहिले आणि ३.५ अब्ज वर्षांआधी, जो स्वत:सारखीच एक ‘झेरॉक्स प्रत’ निर्माण करू शकेल, अशा क्लिष्ट शंृखलेचा जन्म झाला. तोच पहिला जीव, तीच जीवनाची सुरुवात. तीच जैवविविधतेच्या निर्माणाची सुरुवात. अशा साध्याशा जीवामध्ये करोडो वर्षांच्या कालखंडात उत्क्रांती होत जाऊन आजची समृद्ध जैवविविधता निर्माण झाली.
जीवनाच्या एकूणच उत्पत्ती आणि विकासाचा जर आपण आढावा घेतला तर दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवतात, एक म्हणजे जीवन हे अधिकाधिक क्लिष्ट (Complex) होत गेलेले आहे आणि दुसरे म्हणजे अधिक विविधतापूर्ण (Diverse) झालेले आहे. पृथ्वीवरील जीवनाच्या सुरुवातीचे जीव हे अतिशय साधे होते. प्रथिनांपासून बनलेल्या एका भिंतीच्या आत जीवनावश्यक सर्व क्रिया चालायच्या. दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक जीव करत असतो. एक म्हणजे पर्यावरणातून अन्न घेऊन त्यांचे रूपांतर ऊर्जेत करणे आणि दुसरे म्हणजे आपल्यासारखाच जीव निर्माण करणे. जेणेकरून जीवनाचा प्रवाह अखंडित सुरू राहील. ऊर्जानिर्मिती आणि प्रजनन, अशा क्रिया त्या सुरुवातीच्या जीवात चालायच्या. आजच्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या संरचना त्यात निर्माण झालेल्या नव्हत्या. दुसरी गोष्ट म्हणजे, सर्व जीव हे एकसारखेच होते. आजच्या सारखी विविधता ज्याला ‘जैवविविधता’ (Biodiversity) म्हणतात त्यात निर्माण झालेली नव्हती, पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी विविधता वाढत गेलेली आपल्याला आढळते.
निसर्गाला काय गरज होती असं करायची? इतके विविध प्रकारचे जीव! त्यांच्या जगण्याच्या असंख्य पद्धती? हे सारं कसं तयार झालं? का तयार झालं? कोणी तयार केलं, या प्रश्नाचे उत्तर प्रथमत: सुसुत्रीतपणे शास्त्रीय आधारावर चार्लस डार्विन या शास्त्रज्ञाने दिले.
आज आपल्याला पंधरा लाख प्रकारचे जीव माहिती आहेत. म्हणजेच, इतक्या जीवांना विज्ञान नाव देऊ शकले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार ८० ते १ कोटी २० लाख प्रकारचे जीव असावेत. विष्णू पुराणात म्हटले आहे की, प्रत्येक जीवाला निर्वाणापर्यंत पोहोचायला ८४ कोटी योनीतून जावे लागते. आधुनिक विज्ञान मानते की, ८० ते १ कोटी २० लाख प्रकारचे जीव असावेत. दोन्ही हिशोब कुठे तरी जुळत आहेत.
इतके विविध प्रकारचे जीव निर्माण झालेत? निसर्ग निवडीतून (Natural Selection) संसाधन मर्यादित असतात. जगण्यासाठी अन्न, राहण्यासाठी जागा या मर्यादित असतात पण, जीव अमर्याद असतात. अशा परिस्थितीत जगण्यासाठी दोन प्रकारच्या जीवात स्पर्धा सुरू होते. कारण, जिवंत राहणे हा प्रत्येक जीवाचा मुलभूत स्वभाव आहे. कसेही करून जगा, असा संदेश निसर्ग देत राहतो. आत्महत्या हा जीवनाचा स्वभावच नाही. अशा प्रकारच्या संघर्षांत दोन मार्ग असतात. एक तर आपले मार्ग इतरांपेक्षा वेगळे करा किंवा जो ताकदवान असेल तो टिकेल. आपले मार्ग वेगळे करणे म्हणजे विविध प्रकारचे संसाधन वापरायला लागेल. विचार करा, जर सर्व जीव पाण्यातच राहिले असते तर, पाण्यातील संसाधने आणि जागा केव्हाच संपून गेल्या असत्या. त्यामुळे काही जीवांना पाणी सोडून जमिनीवर सुद्धा यावं लागलं. यामुळे दोन प्रकारचे जीव निर्माण झाले, पाण्यातले आणि जमिनीवरचे.
अशा या अद्भुत जैवविविधतेने संपूर्ण पृथ्वी व्यापलेली आहे. जैवविविधतेच्या अशा जाळ्यांमध्ये परस्पर सहसंबंध अचंबित करणारे असतात. अनेक जीव एकमेकांवर विविध प्रकारचे प्रभाव टाकतात. एकमेकांशी स्पर्धा करत, एकमेकांना मदत करत जगत असतात. परिसंस्थेच्या बाबतीत विचार करू या. परिसंस्थेत प्रजातींची विविधता जितकी जास्त असते तितकीच त्याची शाश्वतता जास्त असते. अशी परिसंस्था अनेक जीवांना आधार देऊ शकते. तिची धारण क्षमता (Carrying capacity) अतिशय जास्त असते. अशी परिसंस्था तिच्यात होणाऱ्या नकारात्मक बदलांना आपोआपच कमी करू शकते.
जैवविविधतेच्या बाबतीत भारत समृद्ध प्रदेश आहे. जगातल्या काही मोजक्या जैवविविधता संपन्न राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. परिस्थिती की शास्त्रात एक नियम आहे. अधिवासांची विविधता जितकी जास्त असते तितकीच विविध परिस्थितीकी शास्त्रात एक नियम आहे. अधिवासांची विविधता जितकी जास्त असते तितकीच विविध प्रजातींचीसुद्धा असते. भारतात अधिवासांची विविधता अत्यंत उच्च कोटीची आहे. काही महत्त्वाच्या अभ्यासल्या गेलेल्या प्रजातींची भारतातली संख्या तक्तयात दर्शवली आहे.
जैवविविधता व माणूस, त्याची संस्कृती, खाद्य जीवन, कला, साहित्य यांचा घनिष्ठ संबंध आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातल्या मेंढा लेखा गावात वास्तव्यास असताना आम्ही लोकांना माहित असलेल्या सुमारे ६०० प्रजातींची यादी केली होती. गवताच्या ३० ते ४० प्रजाती सहजतेने तिथला दुक्कू काका सांगू शकायचा. एखाद्या निष्णात अशा वनस्पती शास्त्रज्ञालाही लाजवेल असे हे ज्ञान. खाद्याच्या बाबतीत ४५ प्रकारच्या जंगली भाज्या, अनेक प्रकारचे कंद, माशांच्या अनेक प्रजातींचा उपयोग इथला माणूस सहजतेने करताना आढळतो. निसर्गाबद्दलच्या लोकांच्या अतिशय छोटय़ा छोटय़ा निरीक्षणातून अनेक शास्त्रीय रचना असणाऱ्या गोष्टी माहिती होतात. ग्रिनेल नावाच्या शास्त्रज्ञाने एस्किमोंबद्दल लिहिलंय, ‘एस्किमो ३० विभिन्न प्रकारच्या बर्फाना ओळखू शकतात तर, १० विविध प्रकारच्या चिखलांना वेगवेगळी नावं त्यांनी दिली आहेत. त्यांचे जगणे हे त्या फरकावरच अवलंबून आहे. हेच मेंढय़ातल्या आदिवासींबद्दल बघायला मिळते. गडचिरोलीत पाणगळीच्या प्रकारातल्या जंगलात जैवविविधतेचा मोठा साठा आहे. अशा जैवविविधतेच्या अमाप संपत्तीमुळे इथल्या माणसाच्या जीवनशैलीत प्रचंड विविधता आहे. अनेक प्रजाती वापरायला उपलब्ध असल्याने बहु संसाधन वापर पद्धत (Multiple Resource Use Strategy) इथल्या लोकांनी अंगीकारली आहे. अनेक प्रजातींच्या वापरामुळे कोणत्याच विविक्षित अशा प्रजातीवर ताण येत नाही आणि निसर्गाचं नुकसान होत नाही. जसं जंगलाच्या बाबतीत आहे तसंच शेतीच्या बाबतीत. शेतीत अजूनही धानाच्या पारंपारिक प्रजातीच जास्त प्रमाणात वापरात आहेत. त्यामुळे अजूनही पारंपारिक वाणांचा जनुकीय साठा इथे संरक्षित आहे.
एकूणच काय तर, जैवविविधता आणि लोकं यांचा अतुट असा संबंध सगळीकडे बघायला मिळतो आणि एक तत्व गवसते की, जर जैवविविधता अबाधित राहिली तरच लोकांचं जीवन, त्यांची संस्कृती, लोक-ज्ञान, परंपरा, सवयी अबाधित राहतील. जसजशी जैवविविधता संपून एकसुरीपणा (Monoculture) वाढीला लागेल तसतसे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आíथक प्रश्न निर्माण होत जातील. दुर्दैवाने आज अनेक कारणांनी जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होतांना दिसून येत आहे.
वनस्पती, प्राण्यांचे अधिवास नष्ट होणे, परदेशी प्रजातींची संख्या वाढणे, संसाधनाचा अविवेकी वापर, प्रदूषण यासारख्या कारणांनी जैवविविधतेचा अनमोल ठेवा नष्ट होत आहे. दुर्दैवाने एकसुरीपणाकडे आपली वाटचाल होत असलेली दिसून येते. २००३ पासून मेंढय़ाजवळून वाहणाऱ्या कठाणी नदीत चीनमधल्या नदीत स्थानिक माशांसाठी कर्दनकाळ असणारा ‘तिलापीया’ नावाचा मासा दिसायला लागला आहे. आज जागतिक स्तरावर जैवविविधता नष्ट होण्यात अधिवास नष्ट होण्याबरोबरच परदेशी प्रजातींचे वाढते प्रमाण हेही महत्त्वाचे कारण दिले जाते. म्हणजेच काय तर स्थानिक माशांची विविधता हळूहळू धोक्यात आहे.
अशा परिस्थितीत जैवविविधतेच्या महत्त्वाच्या बाबतीत सर्वानी गंभीरतेने विचार करून मार्ग शोधण्याची गरज आहे. जैवविविधतेवर आधारित लोक समूहांसोबत मिळून त्यांच्या रोजगाराला शाश्वतता प्रदान करून जैवविविधता संवर्धन, शाश्वत उपयोग व फायद्याच्या न्याय्य वाटपाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

आदिवासींचे निसर्ग संवर्धन

आदिवासींचे निसर्ग संवर्धन

आदिवासी आणि निसर्गावर अवलंबून असणारे लोक संसाधनांचा अती उपयोग किंवा दुरुपयोग करतात काय? गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा लेखा ह्या गोंड आदिवासींच्या गावात दोन वर्ष वास्तव्यास असतांना या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं आणि त्याच उत्तर आहे “नाही”. सोबतच आदिवासी हेच निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धनही करतात याचाही उलगडा झाला.

या संबंधात लोपेज, प्रा. माधव गाडगीळ सारख्या काही शास्त्रज्ञानी केलेले अभ्यास मला आठवले. आदिवासी जीवनात संसाधनांचा अतीवापर संभवतच नाही असे ते म्हणतात. जिथे आदिवासी आहेत तिथे तिथे जंगल अजूनही टिकून आहे या पेक्षा मोठा पुरावा आणखी काय असू शकतो! चार प्रमूख कारणांमुळे आदिवासी संसाधनांचा दुरुपयोग, अतिउपयोग करत नाहीत, एक म्हणजे संसाधन मिळवण्याच्या त्यांच्या ज्या पारंपरिक पद्धती असतात त्या फारच साध्या असतात, कितीही प्रयत्न केला तरी एका विशिष्ट काळात त्या पद्धतींनी अधिक संसाधने हाती लागत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे, संसाधनांवर अवलंबून असणारी लोकसंख्या. गडचिरोली जिल्ह्यात किंवा अन्य ही आदिवासी क्षेत्रात लोकसंखेची घनता अन्य भागाच्या तुलनेत फारच कमी आहे, त्याचाही परिणाम एकुणच संसाधन कमी वापरण्यात होत असतो.

तिसरी गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या संसाधनांचा उपयोग करण्याची पद्धती ज्याला परीस्थितिकी शास्त्रात ’बहू संसाधन उपयोग पद्धती’ (Multiple Resource Use Strategy) असे म्हणतात. एकाच प्रकारच्या संसाधनांवर लोक जर अवलंबून असले तर ते विविक्षित संसाधन हा हा म्हणता संपून जाऊ शकते, पण वापरायला अनेक प्रकारची संसाधने उपलब्ध असल्याने निसर्गचक्रात सर्वच संसाधनांचा वापर एका नंतर एक करता येतो. ज्या वेळी एक प्रकारचे संसाधन फळण्याच्या (प्रजननाच्या) प्रक्रियेत गुंतलेले असते तेव्हा अन्य संसाधनांचा विकल्प उपलब्ध असल्याने पहिल्या संसाधनाला फळण्यासाठी बरीच उसंत मिळालेली असते.

आणि चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, संसाधनांचा विवेकशील उपयोग करण्याला कारणीभूत असणारे अलिखित सामाजिक संकेत, परंपरा व धार्मिक नियम.

निसर्गावर आश्रित असलेले लोक पारंपरिक पद्धतीत दोन स्तरांवर निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न करतात असे अभ्यासक मानतात. एक म्हणजे प्रजातीच्या पातळीवर (Species Level), म्हणजे एखाद्या प्रजातीला अभय प्रदान करणे. उदा. माकडाला भारतातल्या बहुतांश भागात अभय प्रदान केलेलं आहे किंवा वडा पिंपळाच्या झाडांना कापण्यावर बंदी घातलेली असते. दुसरी पातळी म्हणजे, परिसंस्थेच्या पातळीवर (Ecosystem Level). उदा. देवराया आणि पवित्र कूंड. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल. इथल्या झाडांना तोडायला बंदी असते. पवित्र तळ्यातील मास्यांना किंवा पाणपक्षांना पकडण्यावर धार्मिक बंदी असते. प्रजातीच्या पातळीवर केल्या जाणाऱ्या निसर्ग संवर्धनात काही प्रजातींना पवित्र मानणे, काही प्रजातींचा उपयोग धार्मिक व मंगल कार्यात करणे, काही विशिष्ठ वयात काही प्रजातींचा उपयोग अन्न म्हणून न करणे, काही विशिष्ट काळातच प्रजातींचा उपयोग करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

मेंढ्यातील गोंड लोकात विविध गोत्राचे (आडनावांचे) लोक विविध प्रकारच्या प्राणी वनस्पतीना देव मानतात, ज्याला इंग्रजीत ’टोटेमीक स्पेसीज’ (Totemic Species) असे म्हणतात. भारतात अंदाजे ३००० च्या आसपास विविध लोकसमूह आहेत. त्यातील जवळ जवळ १००० जनजाती ह्या वनस्पती प्राण्यांना देव मानतात. गोंड लोक हे मुळत: निसर्ग पूजक आहे. गोंड लोकात विविध आडनाव असणाऱ्या लोकांचे विविध देव असतात. ते साधारणत: वनस्पती किंवा प्राणी असतात. लोक समजतात की त्यांच्या कुल देवतेच्या प्रजातींपासून त्यांचा वंश पुढे चालत आला आहे. आपल्या कुलदेवतेला लोक खात नाहीत किंवा कोणतीही इजा करत नाही.

उदाहरणार्थ ’हलामी’ आडनावाच्या लोकांनी बोद मासा खाऊ नये असा नियम आहे तर ’नैताम’ आडनावाच्या व्यक्तिंनी कासव, ‘दुगा’ हे सापाला देव मानतात तर ’हिचामी’ एक प्रकारच्या किटकाला, ’गावडे’ निल गाईला माता मानतात तर ’कुमोटी’ आंब्याच्या झाडाला. मेंढ्यात प्रत्येक आडनावाच्या व्यक्तिचे कोणते देव आहेत याची मी यादी तयार केली, तेंव्हा मी आश्चर्यचकीत झालो, कारण अगदी किटकांपासून तर सस्तन प्राण्यांपर्यंत प्रत्येक वंशाचे आपले देव होते. अशा प्रकारे विविध वंशाच्या लोकांनी काही विशिष्ठ प्रजातींना अभय देण्याचं कारण आहे, एका विशीष्ठ गटाने एखादी प्रजात वापरली नाही म्हणजे ती इतरांना वापरायला मोकळी असते त्यामुळे एकाच प्रजातीवर ताण येत नाही.

ज्या प्रमाणे काही विशिष्ट प्रकारच्या प्रजाती काही आडनावाचे लोक खात नाहीत किंवा इजा करत नाहीत तसच काही विशिष्ट वयातल्या व्यक्तिंनी काही विशिष्ट प्रकारचे प्राणी खाऊ नये असा प्रवाद आहे. उदा. लग्नाआधी करीयाल उसीड (दयाळ पक्षी), बेहरा किडेर (सुतार पक्षी), काकड (कावळा) इत्यादी पक्षी खाऊ नये असा दंडक आहे.

आपण विचार करुया की जर फळं परिपक्व होण्याआधीच लोकांनी एकमेकात स्पर्धा करुन ती तोडायला सुरुवात केली तर एकतर चांगल्या प्रतीची फळे मिळणार नाहीत आणि निसर्गाचेही नुकसान होईल. यासाठी काही विशिष्ठ तिथी नंतरच एखादी विशिष्ट गोष्ट वापरावी असा अलिखित नियम आदिवासी भागात आहे. उदा. चिचोडा भाजी (एक प्रकारची जंगली भाजी), आवळा, करवुल माटी (एक प्रकारचा जंगली कंद) ह्या गोष्ठी चुरनाच्या (चुरना = धान कापणी व मळनी = डिसेंबर जानेवारी) आधी खाऊ नयेत असा नियम आहे. तर पळसवेल, वराली (एक प्रकारची जंगली भाजी), चहा डोडो हे आखाडी (जुलै - गस्ट) च्या पुर्वी वापरात आणत नाहीत. आदिवासी समाजात पोलोची प्रथा पाळली जाते. पोलो म्हणजे सुट्टीचा दिवस. त्या दिवशी कोणतेही शेतीकाम किंवा अन्य काम करत नाही, त्या दिवशी देवपूजा केली जाती. बऱ्याच प्रजाती ह्या पोलो नंतरच वापरल्या जातात.

आता आपण विविध प्रकारच्या आधिवासाच्या पातळीवरच्या निसर्ग संवर्धनाच्या पारंपरिक प्रयत्नांचा आढावा घेऊया. आधुनिक समाजात सरकारी प्रयत्नांनी घोषित केलेले वन्य जीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं इत्यादी असतात. आदिवासी समाजातही काही जागांना त्यातील विविध जीवजातींसह अभय दिलेलं असतं. यातला पहिला प्रकार म्हणजे देवराई. अशी एक देवराई मेंढ्यातही आहे. यातला दुसरा प्रकार असतो पवित्र तळी किंवा डोह. ह्या कुंडी’, ’वादादीन’, ’देव डोह’ सारख्या ठिकाणी लोक मासे पकडत नाहीत. अशी ठिकाणं म्हणजे माश्यां दृष्टीने मेंढ्याच्या लगतहुन वाहणाऱ्या कठाणी नदीवरील ’देवुर साठी एक प्रकारची अभयारन्ये (की अभयकुंडे! refugia) असतात.

अशा प्रकारे अजूनही भारतातल्या अनेक भागात पारंपरिक पद्धतीने निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्य प्रवाहातल्या समाजाने निसर्गाला वाचवण्यासाठी या सर्व निसर्ग मित्रांपासून शिकण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी नवीन पिढी निसर्गापासून दूर जात असल्याने असे प्रयत्न हळुहळू लोप पावतांना सुद्धा दिसतात. निसर्गाबद्दलचे पारंपरिक ज्ञान व पारंपरिक निसर्ग संवर्धनामध्ये निकटचा संबंध आहे. पारंपरिक ज्ञान जर नष्ट होत असेल तर पारंपरिक निसर्ग संवर्धनाच्या व्यवस्था टिकणार नाहीत. यासाठी पारंपरिक ज्ञानाच्या दस्तावेजीकरणाला, उपयोगाला व त्या ज्ञानाच्या उपयोगापासून मिळणा-या फायद्याच्या न्याय्य वाटपाला प्रमोट करण्याची गरज आहे.

नद्या जिवंत कशा करता येतील?

. नीलेश कमलकिशोर हेडा

तस्मा अरं गमाम वो यस्यक्षयायजिन्वथ । आपो जनयथा च न: ॥

अन्न इत्यादीला उत्पन्न करुन प्राणिमात्रांचे पोषण करणाऱ्या दिव्य प्रवाहाचे (नदीचे) आम्ही सान्निध्य प्राप्त करु इच्छितो. आमची उत्तरोत्तर वृद्धी होवो.

(अथर्ववेद, सूक्त ५, मंत्र ३)

भारतातल्या नद्यांची परिस्थिती गंभीर आहे. विश्व पर्यावरण निधी [डब्ल्यू डब्ल्यू एफ] च्या एका अहवालानुसार जगातल्या १० नष्टप्राय होत चाललेल्या नद्यांमध्ये दोन नद्या भारताशी संबंधि आहेत [गंगा सिंधू]. उर्वरित छोट्या नद्यांची स्थिती सुद्धा फारशी चांगली नाही. नद्यांना माता म्हणू पूजणाऱ्या एका राष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. असं का व्हावं? नद्यांना देवीचा दर्जा दिल्याने त्या स्वत:ची काळजी स्वत:च घेऊ शकतात अशी अंधश्रद्धा तर आपल्यात वाढीला लागली नाही? की जागतिक महाशक्ती बनण्याच्या हव्यासापोटी निसर्गाचे दोहन आणि शोषण करण्याची स्पर्धा आम्हा भारतीयांमध्ये सुरु झाली आहे?

माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा ह्या लेखक द्वयींनी नैसर्गिक संसाधन वापरण्याच्या पद्धतींवरुन मानवी समूहाला तीन प्रकारात विभागलं आहे; परिस्थितीकीय समूह (Ecosystem People) म्हणजे निसर्गावर पूर्णत: आश्रीत असणारा समूह, सर्वाहारी (Ominivorous) म्हणजे निसर्गावर प्रत्यक्ष निर्भर नसणारा पण निसर्गाच्या साधन संपत्तीला सर्वात जास्त भोगनारा आणि निसर्गाच्या नाशाला कारणीभूत असा महत्वाचा घटक व विस्थापीत (ecologicle refugies). इंग्रजाच्या कालावधीत आणि नंतरही जे महत्त्व, जो फायदा राजसत्तेने सर्वाहारी समूहाला दिला, नद्यांना प्रदुषीत करण्याचे जे ’लायसन’ बहाल केले त्याच्या परिणाम आज एक भयावह रुप धारण करुन आपल्या समोर येत आहे.

पाण्याचा नदी खोऱ्यात पाणी वापराची पद्धत बदलणे, पाण्याचा अती उपसा, प्रदुषण, जंगलाचा नाश, तिक्रमण, मोठी धरणे अशा अनेक कारणांनी नद्या मृतप्राय होत आहेत. नदी नष्ट होणे म्हणजे केवळ पाण्याचा एक वाहत जाणारा प्रवाहच नष्ट होणे नव्हे तर अमुक एका नदीच्या अनुषंगाने उत्क्रांत झालेली एक सभ्यता व संस्कृती नष्ट होणे असते. सरस्वती नदीचे उदाहरण आपल्या समोर आहे. ख्रिस्त पूर्व ३५०० वर्षांपुर्वी जेंव्हा सरस्वती नदी भारताच्या वायव्य प्रांतात (राजस्थान व लगतचा प्रदेश) लुप्त झाली तेव्हांच एकेकाळची आपल्या उत्कर्षावर पोहोचलेली सिंधू सभ्यता सुद्धा नष्ट झाली होती.

संपणाऱ्या नद्यांना जिवंत करणे हे काही एका दिवसाचं किंवा एका वर्षाचे काम नाही. सर्वांनी एकत्र येऊन जर समग्र दृष्टीकोन समोर ठेवला तर हे निश्चितच होऊ शकते. अशा प्रकारच्या दृष्टीकोनात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे - प्रश्न जर स्थानिक आहेत तर त्याचे समाधान सुद्धा स्थानिक स्तरावर, स्थानिक लोकांकडूनच शोधावे लागेल. वरुन आलेल्या, केंद्रिय पद्धतीच्या प्रयत्नांनी हे काम होणार नाही तर विकेंद्रित पद्धतीने, स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करुन, त्यांना नदी वाचवण्याच्या कामात सामील करुन व शक्य तेथे स्थानिक लोकांना संवर्धनाच्या कामात आर्थिक फायदा देऊनच नद्या जिवंत होवू शकतात.

नदी जिवंत करण्यासाठी नदीतले झरे जिवंत करावे लागतील, नदीत येणारा गाळ रोखावा लागेल, नदीच्या पानलोट क्षेत्रातील जंगल अबाधित ठेवावे लागेल, प्रदुषनाचे स्त्रोत खंडीत करावे लागतील, नदीच्या काही पट्ट्यांना संपूर्ण संरक्षण प्रदान करावं लागेल, नद्यांवर होत असलेली तिक्रमणे थांबवावी लागतील आणि प्रश्न व उपायांच्या बाबतीत जनसामान्यात जन जागृती करावी लागेल.

उपरोक्त गोष्टींसाठी केवळ नदीपुरता विचार करुन चालणार नाही तर नदीला जेथून जेथून पावसाने पाणी येते त्या संपूर्ण भूभागाचा विचार करावा लागेल. अशा भूभागाला आपण नदीचे खोरे (River Basin) म्हणतो. संपूर्ण नदी खोऱ्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी व्यवस्थित असली तर नदीतले झरे जिवंत होऊन नदी आपोआपच जिवंत होईल. या परिपेक्षात संपूर्ण खोऱ्याचा माथ्यापासून पायथ्यापर्यंत (Ridge to valley) पाणलोट क्षेत्र विकास करणे अगत्याचे आहे. आजच्या राजकीय व सरकारी परिस्थितीचा जर विचार केला आणि भारताजवळ असणारी सधन अशी श्रम शक्ती विचारात घेतली तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हे होऊ शकते. पण दुर्देवाने खास नदीच्या संबंधि संवर्धनाची कामे अजुनही रोहयो अंतर्गत काढल्या जात नाही.

नदीशी संबंधित दुसरा प्रश्न आहे नदीत गाळ साचणे. नदी खोऱ्यातला झाडोरा नष्ट, शेतीला बांध बंदीस्ती नसल्याने झाल्याने हजारो टन माती दर वर्षी नद्यात अक्षरश: ओतल्या जात आहे. अशा अवीरत ओतल्या जाणाऱ्या मातीमुळे माश्यांचे व अन्य जलचरांचे नैसर्गिक अधिवास एकतर नष्ट होत आहेत अथवा परिवर्तीत तरी होत आहेत. पाणलोट क्षेत्र विकास व झाडे लावण्याच्या कार्यक्रमांनी मातीची धूप थांबवून नदी पात्रात येणारी माती निश्चितच रोखता येईल. नदीच्या संपूर्ण पानलोट क्षेत्रातू नदीत येणारी असंख्य छोटी छोटी प्रवाहं गली प्लग, छोटे बंधारे सारख्या रचनांनी सजवता येतील. अशा प्रयत्नांनी केवळ नदीचाच फायदा होणार नाही तर मातीतला ओलावा व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून शेतीला सुद्धा लाभ होईल.

प्रदुषण हा नदीचा मृत्यू घडवून आणनारा महत्वाचा मानवी निर्मित घटक आहे. अशा प्रदुषणात महत्वाचे प्रदुषण म्हणजे कारखाण्यांमार्फत होणारे प्रदुषण सोबतच रासायनिक खते व किटकनाशक वापरणाऱ्या शेतीमधून होणाऱ्या प्रदुषणालाही कमी करुन लेखता येणार नाही. नदीच्या आसपास राहणाऱ्या व नदीवर अवलंबून असणाऱ्या गावांना अशा कारखाण्यांबाबत व शाश्वत शेतीच्या संदर्भात जागृत करुन हे रोखता येणे शक्य आहे.

मिनीवरील संरक्षित क्षेत्राच्या बाबतीत (उदा. अभयारण्ये, राष्ट्रिय उद्याने इत्यादी) आपण बरेच जागरुक आहोत व त्यांची संख्या सुद्धा बरीच आहे पण जल स्थानाच्या संबंधित फारसे प्रयत्न केल्या गेलेले दिसून येत नाहीत. पवीत्र कुंडांच्या (sacred Ponds) स्वरुपात जे पारंपरिक संरक्षण स्थानीक लोकांनी दिले आहे तेवढेच. आता स्थानिक लोकांच्या, मासेमारांच्या मदतीने नदीचे काही पट्टे संरक्षित करुन ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. असे पट्टे सर्व प्रकारच्या बाह्य मानवी हस्तक्षेपासून मुक्त ठेवावे लागतील, तिथल्या जल जीवांना अभय प्रदान करावे लागेल. परंतू हे तेव्हांच शक्य आहे जेव्हां स्थानिक लोक त्या साठी पुढे येतील. स्थानिक लोकांना शाश्वत स्वरुपाचा रोजगार पुरविल्यास ते नक्कीच पुढे येतील असा पुर्व अनुभव आहे.

नदीवर अवलंबून असणाऱ्या मासेमारांना आणि अन्य जन जातींना शाश्वत रोजगार कसा पुरवता येईल? पर्यावरणपुरक सहभागी मत्स्य पालनाने व रोहयोच्या माध्यमातून हे शक्य आहे. परंतू सरकारी अखत्यारीत असणारी तलावे व धरणे ही केवळ सधन लोकांसाठीच राखीव झाल्यासारखी वाटतात. संपूर्ण महाराष्ट्रात ’मत्स्य माफियांचे’ फुटलेले पेव गरीब मासेमारांना नदीपासून तोडत आहे. बचत गटांसारख्या माध्यमातुन आर्थिक स्वावलंबन वाढीस लाऊन व सरकारी अखत्यारीतल्या तलावांची माहिती जास्तीत जास्त लोकाभिमुख करुन हे शक्य आहे.

आता मोठ्या धरणांचं अपयश आणि फोलपणा जागतीक स्तरावर सिद्ध झाला आहे. मोठ्या धरणांनी नद्यांची नैसर्गिक परिस्थिती बदलवून टाकण्याखेरीज व नद्यांवर, जंगलांवर अवलंबून असलेल्या गरीब लोकांना देशोधडीला लावण्याखेरीज काहीही केलेलं नाही. तेंव्हा मोठ्या धरणांचा विचार सोडून छोट्या तलावांना, पाणलोट क्षेत्र विकासाला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. मिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरवण्याची मानसिकता वाढीला लागली व त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले की आपोआपच मोठ्या धरणांचा आग्रह कमी व्हायला लागतो.

उपरोक्त गोष्टी ह्या कोणताही कायदा आणून पुर्णत्वास आनता येणार नाहीत. युगांयुगांपासुन निद्रिस्त ग्राम चेतना जोवर जागृत केल्या जात नाही, गावागावातील पक्षीय राजकारणाने नष्ट होत चाललेल्या पारंपरिक व्यवस्थांचे जोवर आपण पुनरुज्जीवन करत नाही तोवर प्रभावी कार्य होऊ शकत नाही. ग्रामसभेसारख्या व्यवस्था खऱ्या अर्थाने काम करायला लागल्या की नद्या जिवंत व्हायला वेळ लागणार नाही. गावागावात नदी बद्दल आत्मीयता व शास्त्रीय दृष्टीकोन ठेवणाऱ्या नदी अभ्यास गटसारख्या व्यवस्था संपूर्ण खोऱ्यात निर्मान करणे गरजेचे आहे.