Sunday, May 29, 2011

नष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परिघ

नष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परिघ

आमाझीरिया हे मध्यप्रदेशातल्या सिवनी जिल्ह्य़ातील एक छोटसं गाव. रुडयार्ड किपलिंग नावाच्या लेखकाने ‘जंगल बुक’ या पुस्तकात गौरवलेला हा मोगलींचा प्रदेश. सपेरे, बंसोड आणि गोंड अशा तीन आदिवासी जमाती या छोटय़ाशा ३० ते ४० झोपडय़ांच्या गावचे रहिवासी. या गावातील ‘सपेरे’ ही जमात सापांचा खेळ करून आणि वनौषधी देऊन उपजीविका करतात. ‘बंसोड’ बांबूच्या वस्तू बनवतात, तर ‘गोंड’ शेती आणि जंगलातील वनोपजांवर अवलंबून आहेत. गावातले हे तीनही मानवी समूह तीन वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत. त्यांच्यात संसाधनांसाठी कोणतीही स्पर्धा नाही. आपापल्या संसाधनांवर पारंपरिक पद्धतीने हे तीनही समूह अवलंबून आहेत. आपापले सामाजिक ‘निश’ सांभाळून आहेत.

परिस्थितीकी शास्त्रात ‘इकॉलॉजीकल निश’ (Niche) नावाची संकल्पना आहे. ही सर्वसमावेशक अशी संकल्पना जशी मानवेतर जीव समूहांना लागू पडते तशीच ती मानवी समाजातील विविध घटकांनासुद्धा लागू पडते. जीव भरपूर असतात पण, संसाधनं मर्यादित असतात. अशा परिस्थितीत सीमित संसाधनातून उपजीविका चालवणे प्रत्येक जीवाला भाग असते. या प्रयत्नातून मग जगण्याच्या विविध पद्धतीचा जन्म होतो. जर सारे जीव एकाच प्रकारच्या पद्धती वापरायला लागले तर संसाधने टिकणार तर नाहीच पण, जीवाजीवात प्रचंड स्पर्धा होऊन साऱ्या निसर्गाचाच तोल ढळू शकतो. निशची संकल्पना सांगते की, परिसंस्थेत प्रत्येक सजीवाची एक विशिष्ट अशी भूमिका, जागा असते आणि त्याच्या त्या खास जागेमुळे त्याचे आणि अन्य सजीवांचे संसाधनासाठीचे संघर्ष टळतात. सोप्या शब्दात सांगायचे तर मांसाहार करणे ही वाघाची निश आहे, तर मासेमारी ही मासेमारांची निश आणि शेती करणे ही शेतकऱ्यांची. आमाझीरियातील तीनही समूहांच्या आपापल्या निश आहेत. ते इतरांच्या संसाधनांवर अतिक्रमण करत नसल्यामुळे त्यांच्यात संघर्ष होत नाहीत.

आता परिस्थिती बदलायला लागलीय. पूर्वीच्या संसाधनांवर अवलंबून असणे आता शक्य राहिलेले नाही. सापांची संख्या कमी झाली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा झालाय. सापांचा खेळ करणेही शक्य नाही. त्यामुळे या लोकांनी आता काय करावे? हा मोठा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा या गावात गेलो तेव्हा, लोकांमध्ये एकप्रकारची भीती होती. हे वनविभागाचे अधिकारी असावेत, अशा साशंक मनाने लोक आमच्याकडे बघत होते पण, त्यांना हळूहळू विश्वास यायला लागला. लोक जमू लागले आणि बोलू लागले.
‘साब, आपने जब कानून बनाया तब हमको पुछा नही, आपने जब कीटनाशक निकाला तब भी हमको पुछा नही.. अब सांप कम हो गये, अब वन विभाग हमारे सांप पकडकर ले जाते है, हमको जीने का कोई सहारा नही रहा.’

आमाझीरियापासून ६०० कि.मी. अंतरावर असलेल्या अकोला जिल्ह्य़ातले पारधी हेच म्हणणे मराठीत सांगत होते. प्रश्न एकच होता. नैसर्गिक संसाधने कमी झाली आहेत. नैसर्गिक संसाधने हिरावून घेण्यात आली आहेत. निशचं अतिक्रमण केलं गेलं आहे.

पारधी हे परंपरेने काळवीट, ससे, मोर, तितर, बटेर यांची शिकार करून उदरनिर्वाह करणारे. शिकार शाश्वतपणे चालत राहावी म्हणून त्यांचे अनेक पारंपरिक नियम आहेत. (उदा. गरोदर मादीची शिकार करू नये वगैरे) पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता बाजारपेठेच्या प्रभावाने आधुनिक बंदुका, प्रखर प्रकाशाचे झोत टाकणाऱ्या विजेऱ्या, हातबॉम्बचा वापर करून पारध्यांव्यतिरिक्त इतर लोकही शिकार करायला लागले आहेत.

एक प्रभावशाली गट स्वत:च्या निशचा परिघ वाढवून दुसऱ्या निशवर आक्रमण करू लागला आहे. सिवनी आणि अकोला या दोन्ही जिल्ह्य़ांचा प्रश्न संसाधन कमी होणे, पारंपरिक निश नष्ट होणे हा आहे. संसाधन कमी होण्याला कोण जबाबदार आहे? सपेरे, बंसोड की पारधी? मला वाटतं यापैकी कोणीही नाही. जबाबदार आहेत ते बाजारपेठेची भूक भागवणारे, संसाधनांचा अविवेकी वापर करणारे मानवी घटक. पारंपरिक लोकांच्या शिकारीच्या किंवा संसाधनांना काढण्याच्या पद्धती इतक्या साध्या असतात की, कितीही प्रयत्न केला तरी त्यातून फार काही हाती लागत नाही.

जशी लोकसंख्या वाढत गेली. मानसाची भूक ही वाढत गेली. शहरे वाढवण्यासाठी जंगले दूर हटवल्या गेली, शहरात रोशनाई करण्यासाठी गावातल्या संसाधनांना वापरुन तयार होणारी विज बाहेर पाठवल्या गेली. गावातले पाण्याचे साठे शहराकडे वळविण्यात आले. मुठभर राजकारण्यांचे आणि बिल्डर्सचे खिसे भरण्यासाठी धरणे बांधल्या गेली. आपली शहरातली सारी मिजास खेड्यातुन वाहणा-या संसाधनांवर अवलंबून आहे. खेड्यांना नागवून आम्ही शहरवासी भरजरी शृंगार करुन बसलो आहोत.

असा विचीत्र खेळ आपल्या देशात नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणाऱ्या लोकांसोबत त्यांची संसाधने गावातून शहराकडे हिरावून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे संसाधनांचेही नुकसान होत आहे. पूर्वी आसपासच्या संसाधनांबद्दल एक प्रेमाची भावना स्थानिक लोकांमध्ये होती. आपलं जंगल, आपली नदी, आपले तळे म्हणून त्याची जोपासना केली जायची. संसाधनांना वापरण्यासाठी समाजाने निर्माण केलेले काही पारंपरिक नियम होते पण, हे सारं आता बदलायला लागलं आहे.
इंजोरी, मानकोपरा ही अडाण नदीच्या काठावर वसलेली गावं. वाशीम जिल्ह्य़ातून यवतमाळ जिल्ह्य़ात वाहत जाणारी अडाण नदी पैनगंगेला जाऊन मिळते. माझ्या पीएच.डी.च्या निमित्ताने या नदीच्या काठावर वसलेल्या भोई आणि धिवर लोकांशी संवाद साधता आला. अडाण नदीवर कारंजा शहराजवळ धरण बाधलं गेलं. नदीतील माश्यांवरचा भोई लोकांचा हक्क संपला. धरण झाल्याने वाहती नदी थांबली.
आर्णी तालुक्यातील चिमटा गावातील लोक अडाण आणि पैनगंगेच्या संगमावर मासेमारी करत होते. दुपार झाली होती. सकाळपासून दुपापर्यंत अंदाजे दोन किलोच्या आसपास त्यांनी मासे पकडले होते. चार लोकात दोन किलो मासे, प्रती माणशी अर्धा किलो! चाळीस रुपये किलो या बाजारभावाप्रमाणे १० रुपये प्रती व्यक्ती ही त्यांची दिवसभराची कमाई! काठावर धनाढय़ लोकांच्या शेती होत्या. पाच अश्वशक्तीच्या मोटारीने संपूर्ण नदी जानेवारीतच कोरडी करण्याचे उद्योग सुरू होते. एक धिवर म्हातारा व्यथित होऊन सांगत होता, ‘आता संपूर्ण नदी कोरडी होणार. पुढचे सहा महिने कसं जगावं? हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. नदीच्या आसपासची जंगल कटाई, नदीकाठच्या शेतीत कीटकनाशकांचा अतोनात वापर, शेतीसाठी नदीच्या पाण्याचा अविवेकी वापर, मासेमारीसाठी विषांचा प्रयोग, परदेशी माशांची पैदास अशा अनेक कारणांनी नदीतील माश्यांची संख्या अतोनात कमी झाली आहे. याचा भरुदड भोई, धिवर, केवट यासारख्या लोकसमुदायांना सोसावा लागत आहे.’

एकूणच काय तर, आधुनिक विकासाने पारंपरिक निसर्गाधारित लोकांची निश पद्धतशीरपणे संपवली आहे.

No comments:

Post a Comment